सोमवार, १९ जून, २०१७

हिंदू कोण – २७

मागील पोस्टवरूनपुढे चालू –

४१. ह्या मुद्याच्या अखेरीस आपण पुरुष स्त्री ह्यांमध्ये खर्या अर्थाने कोण अशुद्ध असू शकतो ते पहायला पाहिजे कारण एरव्ही ही चर्चा अपूरी राहील. पुरुषांना अनेक व्यसने असतात, पुरोहित वर्गांत असे व्यसनी ब्राह्मण बरेच असतात. त्यांना दैहिक व्यसने जास्त असतात. दैहिक व्यसनांत, दारु, वीडी सिगरेट, गांजा, अफु, तंबाखू, सुपारी, जुगार खेळणे, वेश्यागमन इत्यादि येतात. अशा व्यसनांमुळे ते पुरुष अशुद्ध ठरतात. स्त्रीस ही दैहिक व्यसने बहुधा नसतात. त्या ह्याबाबत त्या शुद्ध असतात. मानसिक व्यसनांत मात्र पुरुषांपेक्षा स्त्री जास्त अडकलेली असल्याचे आढळून येते. मानसिक व्यसने अशी, सतत काळजी करीत रहाणे, दुःखी रहाणे, संशय घेत रहाणे, काल्पनिक चिंतेत रमणे, रडणे, मत्सर करणे, भांडखोरपणा. जर स्त्री ह्या मानसिक व्यसनापासून मुक्त असेल तर ती योगशास्त्रातसुद्धा शुद्ध समजली जाते. अशा निर्व्यसनी स्त्रीस पौरोहित्य करण्यास कांहींही हरकत नसावी. शरीराच्या शुद्धते बाबतसुद्धा पुरुषापेक्षा स्त्री जास्त शुद्ध समजली पाहिजे. हे केवळ माणसापुरते आहे असें नाही तर सर्वच प्राण्यांत नरापेक्षा मादी जास्त शुद्ध समजली जाते. उदाहरणार्थ, गोमुत्र पाहिले तर ते गाईचेच असावे लागते बैलाचे मुत्र कोणीही प्राशन करणार नाही कारण ते अशुद्ध असते. दुसरे उदाहरण, शेळीचे घेता येईल. क्षयरोग बरा करण्यासाठी शेळीचे मुत्र पिण्याचा संकेत आहे पण बोकडाचे मुत्र पिता येत नाही. तिसरे उदाहरण माणसांचे घेऊ, मुत्र चिकित्सेमध्ये पुरुषाच्या मुत्रापेक्षा स्त्रीचे मुत्र प्राशनासाठी योग्य समजले जाते. त्याशिवाय पुरुष जर प्रजनन क्षमतेच्या वयाचा असेल तर त्याचे वीर्य गळत असते, त्याकारणांनी तो पुरुष अशुद्ध होत असतो. मनुस्मृतीत वीर्य स्खलन होणार्या पुरुषांस प्रायश्र्चित्य करण्याचे आदेश दिले आहेत. बैल बोकड हेसुद्धा ह्याच कारणांनी वर्ज ठरत असतात. ह्यावरून तत्त्वतः पुरुषापेक्षा स्त्री नेहमीच जास्त शुद्ध असते हे मान्य करावे लागते. असे असतांना खोटीनाटी कारणे पुढे करून तिला अशुद्ध ठरवून स्त्रीचा धर्मपिठाच्या पातळीवर अपमान करणे कितपत श्रेयस्कर ठरते? भक्ति, श्रद्धा प्रेम ह्यामध्येसुद्धा बाई पुरुषापेक्षा अधिक तीव्र प्रामाणिक असते म्हणून योग्य असते. पुरुषाच्या भक्तित, प्रेमांत मतलब असतो पण स्त्री निरलस, निष्काम प्रेम करू शकते हे पहाता मंदिरांतून बायकांनांच पौरोहित्य करण्याची परवानगी मिळाली पाहिजे म्हणून बायकांवरील हे अन्याय थांबले पाहिजेत. ही शास्त्रसुद्ध चर्चा केल्यानंतर असे सुचवावेसे वाटते किं, सर्व देवळांतील पौरोहित्य पुरुषांपेक्षा बायकांनी करणे जास्त श्रेयस्कर ठरते. त्या पुढे जाऊन मी असें सुचवू इच्छितो किं, विधवांनी पौरोहित्याचे शिक्षण घेऊन तो व्यवसाय करावा.
पुढील भाग क्रमशः चालू –

मनुस्मृती सातवा भाग सुरू – २११ – २२१
तटस्थ राजा जर आर्य (सज्जन, सुसंस्कृत) असेल, ज्ञानी असेल, शूर असेल, समजूतदार असेल तर ती त्या राजाची लक्षणे समजून त्याच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करावेत. २११
अशा तटस्थ राजाच्या मैत्रीसाठी समृद्ध, सुपीक, भरपूर गुरंढोरं असलेला प्रदेश सुद्धा सोडून देण्यास हरकत नाही. २१२
प्रसंगी राजाने स्वताच्या प्रकृतीसाठी संपत्तीचा त्याग करावा, संपत्तीसाठी पत्नीचा त्याग करावा, कोठल्याही अवघड परिस्थितीत संपत्ती व पत्नी ह्यांचा त्याग करण्यास तो तयार असला पाहिजे. २१३
राजावर व राज्यावर अनेक वाईट प्रसंग येतात तेव्हां त्यांने साम, दाम, दंड आणि भेद ह्या चार धोरणांचा चतुराईने उपयोग करून प्रसंगावर मात केली पाहिजे. २१४
ह्या चार धोरणांचा विभक्तपणे तसेंच एकत्रितपणे तो उपयोग करील व त्याच्या अंतिम ध्येयाकडे तो वाटचाल करील. २१५
अशारितीने सर्व कामकाजाचा विचार त्याच्या मंत्रिमंडळाबरोबर करून नंतर तो स्नान करील व त्यानंतर अंतःपुरात (राणीकक्ष) भोजनासाठी प्रवेश करील. २१६
तेथे तो जे जेवेल ते त्याच्या विश्र्वासू आचार्याने तयार केलेले असेल. असें स्वैपाकी ज्यांना राजाच्या जेवणाच्या वेळांची माहिती आहे. राजाचे जेवण विशिष्ट मंत्रांनी शुद्ध केलेले असेल. तसेंच पवित्र वाचनाने त्यातील वीष काढून टाकलेले असेल. २१७
वीष नष्ट करणार्या औषधांत मिसळून नंतर ते तो खाईल. तसेंच विषाचा प्रभाव कमी करणार्या रत्नांचा दागिन्यात समावेश केला आहे असेंच दागिने तो वापरेल. २१८
पूर्ण विश्र्वसनीय स्त्रिया, ज्यांच्या अंगावरील दागिन्यांची तपासणी केली आहे त्याच फक्त राजाची सेवा पंखा, अत्तर व पाणी ह्यांने तेथे करतील.
त्याच प्रमाणे राजा ज्या ज्या चिजा वापरतो त्या सर्व जसें वाहन, बिछाना, बैठक, स्नानगृह, साबण, दागिने इत्यादी तपासून घेतले जातील. २२०
भोजन झाल्यावर तो आपल्या राण्यांबरोबर राणीगृहात रमू शकतो परंतु, तेथेसुद्धा तो त्याच्या राजकीय जबाबदार्या विसरणार नाही.

क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृतीचा सातवा भाग पुढे चालू -
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com

आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा