शनिवार, १६ मे, २०१५

मनुस्मृती आणि इतर गप्पा-३

मागील भागा कडून चालू -
२२) विश्व निर्मात्याने त्याच बरोबर अनेक इतर दैवते निर्माण केली. त्यांचे कार्य त्याना नेमून दिले. त्या दैवतांचे खाद्य प्रसाद सुद्धा निष्चित केले.
२३) त्या दैवतांतून अग्नि, सूर्य आणि वायू पासून ऋक्, यजु साम हे तीन वेद त्याने उत्पन्न केले. असे करण्याचे कारण त्या त्या दैवतांचे पुजन कसे करावे ते समजावे. ह्याचा अर्थ अथर्ववेद वैदिक परंपरेतील नाही. अथर्ववेदाचा साधा उल्लेखसुद्धा मनुस्मृतीत नाही हे विशेष आहे.
२४) काळ त्याचे भाग, चंद्राच्या कळा, ग्रह त्यांचे फिरणे, नद्या व त्यांचे वाहणे, पर्वत, सपाट आणि उबडखाबड जमिनी तयार केल्या.
२५) तत्वशिलता म्हणजे वैचारिक शिस्त, वाचा, आनंद, क्रोध, इत्यादी वृत्ति उत्पन्न केल्या.
२६-२७) तसेंच योग्य काय अयोग्य काय हे ठरवून त्यांचे परिणाम सुद्धा निष्चित केले. अशारितीने हे जग तयार झाले.
२८) विश्वनिर्मात्याने जसे नियम केले कामाचे क्रम आखून दिले त्यानुसार हे जग काम करीत असते तसेंच करीत राहील. पदार्थ विज्ञानाचे, रसायन शास्त्राचे असे विविध शास्त्राचे नियम निष्चित केले आहेत ते त्या प्रमाणेच रहाणार असे झाले.
२९) चांगुलपणा, वाईटपणा, त्रासदायकपणा, सज्जनपणा, पुण्यवंत, पापमय, असे काही गुण अवगुण त्या त्या मध्ये विश्वनिर्मात्याने जसे घातले तसे ते बनले.
३०) निसर्गाच्या सर्व व्यवहाराचे क्रम त्यानुसार आखून दिले गेले.
३१) परंतु जगाच्या भल्यासाठी मनुष्य मात्र असा बनवला किं, त्यातील हे सर्व गुण अवगुण तो माणूस बदलू शकत होता. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र त्याने त्याच्या शरीरातून क्रमशः तोंड, हात, मांडी पाय ह्यांमधून उत्पन्न केले. ह्याचा अर्थ इतर सजीव त्यांचे गुण बदलू शकत नाहीत. घोडा गाढवा सारखा वागू शकत नाही, कोल्हा बैलासारखा वागू शकत नाही, गुलाबाच्या झाडाला आंबा लागणार नाही किंवा नारळाला केळी लागणार नाहीत इत्यादी.
ह्याचा अर्थ मनुस्मृतीच्या काळात वर्ण जन्मानुसार होते.
३२) अखेरीस त्याने स्वताच्या देहाचे नर नारी(मादी) असे दोन भाग केले. त्यातील स्त्रीतून विराग उत्पन्न केला.

वर दिलेल्या ३१व्या वचनात जे दिले आहे त्यावरून मनुस्मृती वर्णव्यवस्था जन्मावर आधारीत झाल्यानंतरच्या काळातील आहे हे स्पष्ट होते. मुळभूत सनातन धर्मानुसार चार वर्ण गुणकर्मानुसार असतात. जन्मपत्रिकेतसुद्धा त्या माणसाचा वर्ण दिलेला असतो. महाभारत काळात वर्ण व्यवस्था गुणकर्मानुसार होती ते पुढे राहीले नाही. म्हणजे, एकाच कुटूंबातील निरनिराळ्या व्यक्ति वेगवेगळ्या वर्णात असल्याचे दिसून येते. हे झाले सनातन धर्माचे परंतु, ब्राह्मण धर्मामध्ये एका कुटूंबातील सर्व त्या कुटूंबाच्या जातीचे असे धरले जाते. सनातन धर्म व ब्राह्मण धर्म ह्यात हा मोठा फरक असल्याचे आढळते. चालु हिंदू मान्यतेनुसार वर्ण व्यवस्था वापरात नाही त्या ऐवजी जाती व्यवस्था आहे. प्रचलित हिंदू मान्यता, सनातन आणि ब्राह्मण धर्म ह्यातील हे फरक लक्षात घेण्यासारखे आहेत. ह्याचा अर्थ असा होतो कीं, वर्ण आणि जाती हे एकच नाहीत. असे असले तरी हे दोन शब्द एकाच अर्थाने नेहमी वापरले जातात असे दिसून येते. अशामुळे बराच गोंधळ पसरला आहे असे दिसते. मनुस्मृतीत वेदातील वर्ण आणि नंतरच्या जाती ह्यात गोंधळ केलेला असल्याचे स्पष्टपणे दिसते. ह्यावरून असे समजता येईल किं, ज्या काळात वर्ण व जाती ह्या दोनही एकाच वेळी कार्यरत होत्या त्या काळात मनुस्मृती लिहीली गेली असावी. अशा कारणाने बरेच प्रश्न आज सगळ्यांना त्रास देत आहेत. ब्राह्मण जातीतील लोक ह्या गोंधळाचा भरपूर उपयोग करीत आहेत असे म्हणावे अशी आज परिस्थिती झालेली आहे.
पुढील पोस्ट मध्ये चालू

माझा इमेल ashokkothare@gmail.com

ह्या इमेल वर तुम्ही संपर्क करु शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा