रविवार, २२ जानेवारी, २०१७

हिंदू कोण – १४

. देवांच्या अस्तित्वा बाबत
२१. वैदिक हिंदू धर्माचा इतिहास पाहिला तर असें दिसते किं, ऋग्वेदाच्या काळात देवतांच्या (पितरांच्या) पुजा अगदी साध्या सोप्या होत्या परंतु, पुढे शुक्ल यजुर्वेदाच्या काळात त्या बर्याच मोठ्या व्यापक झाल्याचे आढळते. विशेष करून याज्ञवल्क्याच्या काळात हे जास्त वाढल्याचे आढळते. याज्ञवल्क्याने यजुर्वेदातील शुक्ल हा भाग लिहीलेला आहे. ह्याचे कारण, त्या काळात पौरोहित्याचा धंदा फार मोठ्या प्रमाणात वाढला होता. तो एवढा वाढला होता किं, त्याला कर्मकांड (कर्मकांड हा शब्द यज्ञयागांबद्दलची तुच्छता दाखवणारी संज्ञा आहे) म्हणण्याची पाळी आली. दोन मिनीटांत उरकता येणार्या विधींचा पसारा ह्या ब्राह्मणांनी एवढा वाढवला किं, अशा पुजा दिवसभर होत राहिल्या. ह्याचे कारण उघड आहे, जेवढी मोठी पुजा तेवढी दक्षिणा जास्त. इतक्या ब्राह्मणांना जेवण द्या, एवढे दान करा अशा मागण्या पुरोहितांनी करून हा ब्राह्मणी धंदा भरपूर वाढवला आहे. सामान्य भक्तांचे ह्या विषयाचे ज्ञान जुजबी असल्याने हे सर्व विनासायास होत आहे, आणि हे असें आजतागायत चालू आहे.

एकदा एकाद्या गोष्टीचा धंदा झाला किं, त्याचे स्वरूप सर्वभक्षक होते तसेंच ब्राह्मणकाळात झालेले दिसते. अशारीतीने ब्राह्मणांनी हिंदूधर्माचे धंदेवाईक स्वरूप उभे केले ते आज आपण पहात आहोत. मनुस्मृतीतून ब्राह्मणांनी स्वतःचे महत्व कसें वाढवले होते ते समजते. ब्राह्मणांच्या ह्या सर्वभक्षक कारभारावर समर्थ रामदास स्वामींनी लक्ष वेधून ब्राह्मणांना ताकीद दिली होती किं, त्यांनी हे व्यवहार आटोपते घ्यावेत नाहीतर त्याचा नाश होईल. तरीसुद्धा ब्राह्मणांचा सर्वभक्षक कारभार तसांच चालू राहिला आहे. त्यापुढे जाऊन ब्राह्मणांनी स्वताला भूदेव म्हणून घेण्यास सुरुवात केली देव म्हणजे जणुकाय त्याच्या दारात बांधलेले कुत्रे आहे किं काय अशी शंका येऊ लागेल. अशारितीने हे ब्राह्मण त्यांच्या काल्पनिक देवापेक्षा मोठे झाले. ते इतके किं, कांहीं प्रसंगी पुरोहित देवाची भिती दाखवून भित्र्या अनुयायांना लुबाडतात असें सुद्धा आढळते.
२२. आज परिस्थिती पहाता, आता विज्ञानकाळ सुरु झाला ब्राह्मण काळ (अथवा पुरोहित काळ) संपुष्टात येण्याची वेळ आली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे. हे केवळ हिंदूंमध्ये होत आहे असे नसून सर्वच धर्मांतील पुरोहितांना त्या त्या धर्मातील अनुयायी विविध प्रश्र्न विचारू लागले आहेत. विज्ञान काळात प्रश्र्न विचारणे हे एक मुलभूत कार्य झाले आहे. सर्वच धर्मातील जिज्ञासु मंडळी जेव्हा कळीचे प्रश्र्न विचारू लागले तेव्हा हा सत्ताधारी पुरोहित वर्ग संतापून प्रश्र्न विचारणार्यांस हरप्रकारे त्रास देऊ लागला. जाती बाहेर काढणे, बहिष्कार टाकणे, मारून टाकणे, खोटेनाटे आरोप करणे, छळ करणे असे अनेकविध उद्योग सुरु झाले, रोमन कॅथोलिक चर्च शंकराचार्यानी विरोधकांना जीवंत जाळल्याची उदाहरणे आहेत. प्रश्र्न विचारणार्यांच्या मुस्कटदाबीचा कहर झाला पण कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, तसेंच प्रश्र्न विचारणे चालूच राहिले. कालांतराने प्रश्र्न विचारणार्यांची जीत झाली पुरोहित वर्ग बाजूला झाला. विज्ञानाचा विजय झाला. आता ह्या सुधारलेल्या परिस्थितीत आपण धर्माचा शास्त्रशुद्ध अभ्यास करीत आहोत त्यामुळे परमेश्र्वर कृपाळु, दयाळु, क्षमाशिल नसल्याचे लक्षात आले आहे. जेव्हा वैज्ञानिक दृष्टीने धर्माच्या संकल्पनांचा अभ्यास सुरु झाला तेव्हा इस्लाम पोपचा (म्हणजे चर्चचा, म्हणजे त्या पुरोहितांचा) ख्रिस्तीधर्म भ्रामक कल्पनांवर आधारीत असल्याचे स्पष्ट झाले. खरा हिंदू विचार मात्र त्या परीक्षेतून सहीसलामत पार झाला.
क्रमशः पुढे चालू –
मनुस्मृतीचा सहावा भाग सुरू – ५१ – ७०
भिक मागण्यासाठी तो संन्याशांच्या मठांकडे, ब्राह्मणांच्या वस्तीकडे, कुत्री, मांजरी, पक्षी ह्यांचा उपयोग न करतां आपली भिक मागेल. ५१
तो त्याचे डोक्याचे केस, नखे, दाढी, मिशा कापून आणि हातात कमंडलु घेउन सदैव भटकत व संयमात राहून कोणालाही न दुखवता राहील. ५२
तो धातूचे पात्र वापरणार नाही. तो जे पात्र वापरेल तो चिरलेले नसेल, त्याचे पात्र पाण्याने स्वच्छ केलेले असेल. जशी यज्ञाची भांडी असतात. ५३
मनु, स्वयंभूचा मुलगा, सांगतो, तो लाकडाचे कमंडलु, मातीची बशी व चिरलेल्या बांबूनी बनवलेली अशी संन्याशाची सामुग्री तो वापरेल. ५४
तो दिवसातून एकदा भिक मागण्यासाठी फिरेल. तो उगाचच जास्त भिक मिळावी म्हणून प्रयास करणार नाही. कारण, असें केल्याने त्याच्या वासना जागृत होण्याचा धोका असतो. ५५
लोकांच्या घरातील चुली विझल्या आहेत, खलबत्ता शांतपणे बाजूला ठेवला आहे, चुलीतील कोळसे विझले आहेत, सर्वांची जेवणे उरकलेली आहेत, ताट, वाटी स्वच्छ करून ठेवली आहेत, अशा निरवानिरवी नंतर संन्यासी भिक मागण्यासाठी निघेल. ५६
काही मिळाले नाही म्हणून तो दुःखी होणार नाही. जास्त मिळाले म्हणून खुष होणार नाही. तो फक्त गरजेपुरते मिळवेल आणि जे मिळेल त्यावर संतुष्ट होईल. ५७
लोकांनी आनंदाने सन्मानपूर्वकपणे जर भिक दिली तर ती त्याने घेऊ नये कारण, अशा भिकेत मोह दडलेला असतो. अशा मोहाचा त्रास मोठमोठ्या संन्याशांना झालेला आहे. नेहमी अनोळखी सज्जन गृहस्थाकडून भिक घ्यावी. ५८
थोडे गरजेपुरते खाऊन मग उभ्याने अथवा बसून तो एकांतात ध्यानासाठी बसेल. कोणत्याही मोहापासून मुक्त होण्यासाठी तो असें करेल. ५९
सर्व वासनांचा त्याग करून प्रेम व द्वेष अशा कोणत्याही वृत्तीच्या आहारी न जाता तो कोणालाही शरीराने अथवा मनाने इजा करणार नाही. असा संन्यासी अमरत्व प्राप्त करतो. ६०
तो पाप करणार्या लोकांच्या, जे नरकात व यमलोकात होणार्या दशेची प्रचिती घेईल. त्यांच्या हालांचा अनुभव घेईल. ६१
लोभ व मोह ह्यात अडकल्यामुळे त्यांचे प्रियजनांपासून विरह होणे, अयोग्य लोकांशी होणारे नाते, त्यामुळे त्यांचे होणारे नुकसान वृद्धत्वाचे आजार, शरीराचे होणारे हाल हे सर्व तो पाहिल व त्यातून तो कांहीं शिकेल, ६२
मृत्यूनंतर आत्म्याचे दुसर्या गर्भात प्रवेश करणे, आणि त्या आधीच्या मधल्या काळात त्या आत्म्याचा अनेक योनींतून होणारा प्रवास ६३
पापकर्मामुळे होणारा शरीराला त्रास, आणि पूण्यकर्मामुळे मिळणारे अवीट सुख ६४
हे सर्व तो ध्यानाच्या मदतीने अनुभवू शकतो. आत्म्याचे सुक्ष्मरूप तो पहातो, त्या स्वयंभूचे सर्व चराचरातील (उच्च, नीच) अस्तित्व तो ध्यानाच्या मदतीने अनुभवतो. ६५
तो ज्या कोणत्या शाखेचा (तत्त्वज्ञानाची) उपासक (पुरस्कर्ता) असो, त्याचे महत्व रहात नाही. त्याने सर्व चराचरांबद्दल सम बुद्धि ठेवून संयमाने राहून साधना करावयाची असते. ६६
कटक झाडाच्या फळांनी पाणी निवळ होते तरी त्या फळाच्या केवळ उल्लेखाने पाणी स्वच्छ होत नाही. ६७
जीवंत प्राण्यांना मदत करण्यासाठी तो संन्यासी, रात्रंदिवस जरी स्वताला वेदना होत असल्या तरी जमीन न्याहाळत प्रवास करीत राहील. ६८
अनवधानाने जर संन्याशाने निरपराध प्राण्याला इजा केली असेल तर तो आंघोळ करून सहा वेळा प्राणायाम करील. ६९
नियमानुसार त्याने तीन वेळा दीर्घ प्राणायाम करावा. व्यार्हीती मंत्र आणि ओम उच्चारणे ही उच्च दर्जाची तत्त्वशिलता जी ब्राह्मणांस उचित आहे ती तो आचरणात ठेवील. ७०

मनुस्मृतीचा सहावा भाग पुढे चालू
पुढील पोस्ट पासून मनुस्मृतीचा अभ्यास इतर गप्पा अशाच चालू रहातील.
माझा संपर्क ईमेलashokkothare@gmail.com
आपली मते मला ह्या ईमेलवर पाठवून हा ब्लॉग अधिक चांगला करण्यास मदत करावी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा